पुणे : रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अर्थात आरबीएस इंडिया कंपनीच्या वतीने नुकतेच यंदाच्या आरबीएस अर्थ हिरो पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये निसर्ग आणि पक्षी संवर्धन क्षेत्रासाठी दर्शवलेल्या बांधिलकीसाठी इला फाउंडेशनचा आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे हे यंदाचे नववे वर्ष असून, हवामान बदलासंदर्भात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील विविध व्यक्तींचा या वेळी सन्मान करण्यात आला.
केंद्रीय राज्यमंत्री कृष्णन रेड्डी, बाबुल सुप्रियो, निती आयोगाचे सदस्य रमेश चंद, विशेष सचिव सिद्धांत दास यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी आरबीएस फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरबीएस इंडियाचे सस्टेनिबिलीटी प्रमुख एन. सुनील कुमार, आरबीएस इंडियाच्या सेवा विभागाचे देश प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज फातरफोड उपस्थित होते.
इला फाउंडेशन ही बिगर सरकारी नोंदणीकृत चॅरिटी संस्था विविध निसर्ग संवर्धन उपक्रम राबवते. भारतीय वन सेवा, भारतीय सैन्य दल, पशुवैद्यकीय आणि आरोग्य सेवा, शाळा आणि विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि तळागाळातील समाजाबरोबर काम करत ती निसर्ग संवर्धनाच्या मुलभूत संकल्पना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवत आहे.
या वेळी ओडिशाच्या प्रमिला बिसोई यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजस्थानचे भोलू अबरार खान, आसामचे दिम्बेश्वर दास यांना ग्रीन वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर उत्तरप्रदेशच्या ऐश्वर्या माहेश्वरी आणि तामिळनाडूचे एस. सतीश यांना सेव्ह द स्पेसीज पुरस्कार देण्यात आला. काश्मीरचे जलालउददीन बाबा यांना इन्स्पायर विभागातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.